मंगलवार, 25 अक्तूबर 2011

श्रीमंत व्हा



नोक-यांच्या वाटा अत्यंत अरुंद झाल्या आहेत. त्यामुळे फर्स्ट क्लास मिळवून ग्रेज्युएट झालेल्याला नोकरी लागेलच यांची काहीच खात्री नसते. त्यामुळे पैसे कमावण्याचा वेगळा विचार करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
यासाठी सर्वप्रथम स्वत:च्या मानसिकतेत बदल करायला हवा. नोकरी मिळवण्यासाठी धडपडण्याऐवजी पैसे कमावण्याची कला अवगत करण्याचा विचार करायला हवा. पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेले सिंधी आणि राजस्थानची वाळवंटी वाट तुडवून मुंबईत आलेल्या मारवाड्यांनी नोकरी नव्हे तर पैसा मिळवायचा या ध्येयाने झपाटून जाऊन आपल्या कर्तुत्वाच्या टोलेजंग इमारती उभारल्या. या सर्वांच्या ‘मनी’चे भाव आणि आपल्या आईवडीलांच्या मनीचे भाव आपण आतापर्यंत वेगळे समजत होतो. अर्थात दोघांनाही पैसा कमवायचा होता, परंतु आपल्या आईवडिलांना प्रामाणिकपणे नोकरी करून तो कमवायचा होता. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. ते शिक्षणावर भर देत आले आहेत. कारण त्यांची परंपरा मनीपेक्षा मनाने श्रीमंत होण्याकडे कल अधिक होता. म्हणूनच नोकरी मिळविण्यात आणि मिळालेली नोकरी टिकविण्यात ते मोठी धन्यता मानत. त्यामुळे आज अनेक बड्यां कंपन्यात वा उद्योग समुहात मोठ्या पोस्टवर मराठी माणसे दिसतात. महिनाअखेर हातात पडणा-या पगारातून इन्कम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, असे अनेक टैक्स परस्पर कापून गेल्यावर हातात उरणा-या पगारातून वीजबिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, विम्याचा हप्ता, मुलांची फी, ट्युशन फी या सर्वाचा ताळमेळ करत बसायला लागते. आपले आईवडील आयुष्य हेच करत असल्याने नोकरी टिकवण्यात समाधान मानणे अशीच मानसिकता त्यांची घडत राहिली व मुलांनीही आपलाच मार्ग अवलंबावा अशी त्यांची इच्छा असते.
व्यवसायाच्या दृष्टीने शाळेत मिळणारे शिक्षण कालबाह्य असते. आर्थिक व्यवहारात त्याचा उपयोग होत नसतो. कारण व्यवहाराचे नियम वेगळे असतात. त्यासाठी पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. म्हणूनच आपण वेगळा विचार करावा.
पैसे कमवायचे धडे रस्त्यावर उतरूनच गिरवावे लागतात. पुस्तक वाचून सायकल वा पोहायला शिकता येत नाही. व्यवसायातही शिरताना पडण्याची भीती धोका असतोच. अपयशातूनच माणसाने शिकायचे असते. अपयशाचा धोका बाळगूनच आज अनेक शोध लागले. मानव चंद्रावर पोहचला. अनेकदा शून्यावर बाद होऊनही सचिनने ४० हून अधिक शतके ठोकलीच. यासाठी जबर इच्छाशक्ती लागते. ती आपल्यात निर्माण करण्यासाठी प्रथम मानसिकतेत बदल करायला लागतो.
पैसा मिळवणे अवघड आहे, मी श्रीमंत होणारच नाही, फार कठोर परिश्रम घ्यावे लागतील, मला ते जमणार नाही, आम्ही आहोत तसेच बरे आहोत, ही मानसिकता सोडावी लागणार आहे. पैसा हे माझे बलस्थान आहे. असा विचार करणे गरजेचे आहे. केवळ १० % लोक या निर्धाराने पैसे कमावतात. मोजक्या लोकांकडे ९० % पैसा असतो. चांगल्या कंपनीचे ९० % शेअर्स याच लोकांकडे असतात.
हे १० % लोक धोका पत्करतात. जोखीम घेतात. त्यांचे स्वत:चे सूत्र असते. गर्दीत ते शिरत नाहीत. जे सर्वजण करतात ते ते करत नाहीत. म्हणूनच तेजीच्या काळात ते शेअर बाजारापासून दूर राहतात त्यामुळे बाजार कोसळला तरी त्यांना फटका बसत नाही. याउलट बाजार कोसळतो तेव्हा ते त्याकडे खरेदीची नवी संधी म्हणून पाहतात. हे तंत्र आपणही शिकले पाहिजे.
गुंतवणुक म्हणजे केवळ शेअर बाजार नव्हे. रियल इस्टेट, कमोडिटी इत्यादी अनेक क्षेत्रे आहेत त्याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. फावल्या वेळेत वेळ काढून उद्योग वा गुंतवणुकीचे आर्थिक प्लान कसे करावे हे शिकले पाहिजे. रॉबर्ट कियोसाकी यांचे ‘ रिच डेड्स गाईड टू इन्व्हेस्टिंग’ हे पुस्तक एकदा नव्हे तर दोनदा वाचून काढावे. त्यामुळे तुमची मानसिकता बदलण्यास मोठी मदत होईल.
( जॉन कोलासो यांच्या लेखातील काही अंश- साभार )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly