बुधवार, 28 जनवरी 2015

रजोनिवृत्ती


रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.

निवृत्ती म्हटली की कसेसेच व्हायला लागते. निवृत्त होताना जणू काही आता जीवनात काही उरले नाही, अशा तऱ्हेने माणसे वागायला लागतात. खरे पाहताना निवृत्ती कामाच्या बदलाची असते. निवृत्ती ही नवीन क्षेत्र समोर उघडण्यासाठी संधी देत असते. अनेक वर्षे जे काही केले त्या कामाने आलेला कंटाळा झटकून टाकून काहीतरी नवीन कार्य करण्याची निवृत्ती ही सुरवात असू शकते. तसे पाहताना निवृत्तीपूर्वीची काही वर्षे थोडे थोडे काम कमी करून इतर कार्यक्षेत्रात भाग घेतल्यास निवृत्तीची भीती वाटत नाही व निवृत्तीमुळे शरीर-मनावर काही विपरीत परिणाम होत नाहीत.

रजोनिवृत्तीच्या बाबतीतही असाच विचार करायला हरकत नसावी. रजोनिवृत्ती जरी फक्‍त स्त्रियांपुरती मर्यादित असली, तरीसुद्धा स्त्री-पुरुषही एक जोडी असल्यामुळे स्त्रीच्या निवृत्तीचा काही परिणाम पुरुषावर होतोच. "रज' हा शब्द रसरक्‍तासाठी वापरलेला आहे. ज्या प्रक्रियेद्वारा जन्म घेता येतो, त्याच्याशी संबंधित असलेला हा रसधातूचा उपधातू. स्त्रीच्या अंडाशयातून प्रत्येक महिन्याला जन्म देण्याची शक्‍यता असलेले एक बीजांड बाहेर पडते, हे बीज फलित न झाल्यास गर्भाशयातून बाहेर पडणारे रज (र+ज) ही साधी समजूत करून घ्यायला हरकत नाही. रजःप्रवृत्ती साधारणपणे मुलगी वयात आली की म्हणजे साधारण बाराव्या- तेराव्या वर्षापासून सुरू होते व ती प्रत्येक महिन्याला होत असल्याने त्याला मासिक धर्म असेही म्हटले जाते. बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू झालेली व प्रत्येक महिन्याला तीन-चार दिवस चालणारी ही क्रिया अनेक वर्षे नित्यनियमाने सुरू असते. त्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध होते. या सर्व प्रक्रियेचे आरोग्य बरोबर असले तर संततीला जन्म देण्याची शक्‍यता म्हणजेच स्त्रीला मातृत्व प्राप्त होण्याची शक्‍यता वा योग्यता दिसून येते आणि मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध झाल्याने ती भाग्यवान ठरते.

या रजोदर्शनाचा व त्या तीन-चार दिवसांच्या कालावधीचा बाऊ करून जनमानसात त्याविषयी अनेक समजुती-गैरसमजुती पसरलेल्या दिसतात. मुळात स्त्रीचे शरीर अतिशय संवेदनक्षम असते. तिच्या शरीरातील अग्नी व सर्व हार्मोन्सची व्यवस्था फारच नाजूक रीतीने कार्यान्वित असते. या दोन्ही गोष्टींचा संबंध मानसिकतेशी असल्यामुळे ही सर्व प्रक्रिया खूप अवघड व गुंतागुंतीची असते. तेव्हा रजोप्रवृत्तीवेळच्या चार दिवसांत स्त्रीच्या वात-पित्त-कफदोषात नक्कीच काहीतरी बदल होत असतात. तसेच या काळात पंचप्राणांपैकी प्राण-अपानातसुद्धा बदल होतात. तसे बदल होणे आवश्‍यक असते, तरच रजोदर्शन होऊन बरोबर तीन-चार दिवसांपर्यंत रज शरीराबाहेर टाकले जाणे शक्‍य होते. या प्राणाच्या अधोगामी वृत्तीमुळे शरीरात शक्‍तिसंचार अधोगामी झालेला असतो आणि म्हणून त्यासंबंधीचे काही नियम पाळणे आवश्‍यक असते. रजःप्रवृत्तीच्या दिवसांत खालच्या बाजूला वाहणारा शक्‍तीचा प्रवाह कुठल्याही तऱ्हेने अवरोधित होऊन रजःस्राव होण्यासाठी अडथळा उत्पन्न होऊ नये, हे पाहणे आवश्‍यक असते. गर्भधारणा झाली तरच रजःप्रवाह थांबावा.

सामान्य माणसाचा प्राणप्रवाह मेंदूकडे होणे अपेक्षित असते. ज्या गोष्टींमध्ये प्राणशक्‍ती वर उचलून नेण्याची क्षमता असेल, अशा गोष्टी या चार दिवसांत केल्या जाऊ नयेत, यासाठी नियम केलेले दिसतात. स्त्रीने एकदा का दैनंदिन व्यवहारात भाग घ्यायचा ठरविला, की गुंतागुंतीचे जीवनमान व तिच्या मनोव्यापारातील गुंतागुंतीमुळे शरीरातील हार्मोन्सच्या प्रक्रियेवर व रजःप्रवृत्तीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून रजःस्वला स्त्रीने मानसिक ताण वाढू शकेल अशा व्यक्‍तीशी शक्‍यतो संपर्क टाळावा, विश्रांती घ्यावी, फार अवघड कामे करू नयेत.

रजःप्रवृत्ती ही एक कटकट वाटली, अपत्यप्राप्तीच नको वा हवी असलेली एक-दोन अपत्ये झाल्यावर रजःप्रवृत्तीची आवश्‍यकता काय, अशा समजातून व ही सर्व कटकट नको म्हणून रजोनिवृत्ती लवकर यावी, अशी अनेक स्त्रियांची अपेक्षा असते.

कामधंद्यातून निवृत्त व्हायची वेळ न येता आधीच निवृत्ती घेतल्यानंतर एखादा व्यवसाय चांगला जमल्यास ठीक, अन्यथा निवृत्तीनंतर मिळालेले पैसे संपल्यावर त्रास होतो, तसा वेळेच्या अगोदर रजोनिवृत्ती आणण्याचा प्रयत्न केल्यासही बऱ्याच प्रकारचा त्रास होऊ शकतो. खरे पाहताना स्त्रीचे रजःप्रवृत्ती चालू असेपर्यंत पुरुष व स्त्री हा भेद दिसतो.
एकदा रजोनिवृत्ती झाली, की स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढायला लागते. परिणामतः स्त्रीच्या शरीरात पुरुषासारखे काही बदल दिसायला लागतात. स्त्रीचे सौंदर्य, स्त्रीचा स्वभाव, स्त्रीची विशेषता स्त्रीत्वात असते. या स्त्रीत्वाचीच निवृत्ती केली, तर स्त्रीचा मूळ धर्म टाकून केलेली वागणूक नैसर्गिक राहणार नाही, अशी शक्‍यता तयार होते. रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे बदल त्रासदायक ठरू नयेत म्हणून केलेल्या औषधोपचार योजनेमुळे इतर त्रास होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते आणि म्हणून नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाययोजना श्रेयस्कर ठरतात. बऱ्याच स्त्रियांची नैसर्गिकपणेच रजोनिवृत्ती लवकर होते, पण अशा वेळीही स्त्रियांच्या स्वभावात बदल झालेले दिसतात. काही वेळा स्त्रीला काही विशेष रोग झाला असता रजोनिवृत्ती लवकर येताना दिसते. रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.

म्हणून अपेक्षेप्रमाणे एक वा दोन मुले झाल्यावर अधिक अपत्यप्राप्तीची इच्छा नसली तरी रजोनिवृत्ती येऊ नये यासाठी स्त्रीने प्रयत्न करून पाहावेत. रजःस्रावामुळे शरीरातील रक्‍त प्रमाणाबाहेर कमी झाले तर रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. या चार दिवसांच्या कालावधीत जर स्त्रीच्या मन-शरीरावर भलतेच आघात झाले तर रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. शिवाय आता काही गरज उरलेली नाही म्हणून गर्भाशयच काढून टाकले तरी अकाली रजोनिवृत्ती येते. मुद्दाम ओढवून घेतलेल्या रजोनिवृत्तीनंतर वजन वाढणे, संधिवात, मधुमेह, हृदयविकार असे वेगवेगळे त्रास सुरू झाले, असे अनेक स्त्रिया सांगताना दिसतात. तेव्हा नैसर्गिक रजोनिवृत्तीपेक्षा मुद्दाम ओढवून घेतलेली रजोनिवृत्ती स्त्रीला अधिक बाधक ठरू शकते.

प्रत्येक महिन्याला रजोदर्शन सुरू असेपर्यंत स्त्री-पुरुषांतील ओढ वेगळी असते. रजोनिवृत्तीनंतर मात्र त्यात बदल होतो. अवेळी ओढवून घेतलेल्या रजोनिवृत्तीमुळे अशा तऱ्हेचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी औषधे घेण्याची वेळ येते व त्यातून वेगळा त्रास होऊ शकतो. रजोनिवृत्तीच्या वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीरात असलेली हाडे व्यवस्थित राहावी, संपूर्ण शरीराचे संतुलन राहावे, शरीरातील कॅल्शियम, लोह नीट टिकावे म्हणून विशेष आयुर्वेदिक उत्पादने घेण्याची आवश्‍यकता असते. तसेच एरवी दूध आवडत नसले तरी रजोनिवृत्तीच्या काळात दूध घेणे अत्यावश्‍यक असते. ज्या स्त्रियांना रजःप्रवृत्ती होते त्या प्रत्येक स्त्रीने रक्‍त वाढण्यासाठी रक्‍तवर्धक योग व अन्न लक्ष ठेवून घेणे श्रेयस्कर ठरते. असे असताना रजोनिवृत्तीच्या वेळी तर या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचे संतुलन ठेवणे खूप आवश्‍यक असते. तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी गुप्तांगावर कोरडेपणा येणार नाही याची काळजी घेणेही खूप आवश्‍यक असते. रजोनिवृत्तीच्या वेळी केस गळणे, स्वभाव चिडचिडा होणे या गोष्टी टाळायच्या असतील तर आधीपासून काळजी घेऊन आयुर्वेदाने सांगितलेले उपचार करून घेणे आवश्‍यक असते. अशोकारिष्ट, कुमारी आसव, शतावरी कल्प, प्रवाळपंचामृत, कामदुधा, मौक्‍तिक वगैरे सर्व योग किंवा हे योग वापरून तयार केलेली विशेष औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्‍यक असते. मासिक धर्म चालू असताना नैसर्गिक नियम पाळले तर अकाली रजोनिवृत्ती येणार नाही. तसे पाहता पुरुष कामेच्छेपासून कधीच निवृत्त होत नाहीत, परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रीची कामेच्छा कमी होऊ शकते. अशा वेळी कौटुंबिक संबंधात अडचणी आलेली उदाहरणे दिसतात.

पुरुष जसे व्यवसायातून म्हणजे कामातून स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतात, तशी नोकरी करणाऱ्या स्त्रीने कामातून स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हरकत नाही; पण रजोनिवृत्ती ओढवून घेऊन म्हातारपण जवळ आणणे इष्ट नाही. तेव्हा सर्व नियम पाळून आपली रजःप्रवृत्तीची क्षमता उतारवयापर्यंत चालू राहील, असा प्रयत्न केल्यास स्त्रीचे तारुण्य जास्तीत जास्त टिकून राहू शकते. तिचा जगाला वात्सल्य व प्रेम दारा स्वभाव टिकून राहू शकतो. तेव्हा रजोनिवृत्तीची काळजी प्रत्येक स्त्रीने घेणे इष्ट आहे.

Tags: Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

खरंच वाढतात का तेलाने केस? केस गळणे, थकवा, थायरॉइड, मेडीकल, वजन कमी होणे, वजन वाढणे किरकोळ भाजल्यास, उन्हात, काळपट, काळेमिरे, किरकोळ, कुस्करून, केस काळे, जायफळ

केसांचे आरोग्य प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग आणि तेल सांगितली आहेत. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होईल. त्यामुळे अमुक तेल लावले, की केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
डोळे, दात, चेहऱ्याची ठेवण, त्वचेचा रंग वगैरे गोष्टी व्यक्‍तिविशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीत वेगवेगळ्या असतात. तसेच केसांची ठेवण, केसांची प्रत, केसांचा रंग तसेच केसांची लांबी वगैरे गोष्टीसुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरत असतात. म्हणूनच प्रकृतिपरीक्षणात "केस' हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो.
तेलाने केस वाढतात का हे समजण्यासाठी आधी केसांची मूलभूत माहिती घ्यायला हवी. आयुर्वेदाने केसांचा संबंध हाडांशी असतो असे सांगितले आहे.
स्यात्‌ किट्टं केशलोमास्थ्नो ।
...चरक चिकित्सास्थान
अस्थिधातूचा मलभाग म्हणजे केस व रोम होत. अस्थिधातू तयार होतानाच केस तयार होतात व म्हणूनच केसांचा हाडांशी खूप जवळचा संबंध असतो. हाडे अशक्‍त झाली तर त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो असेही आयुर्वेदात सांगितले आहे.
केशलोमनखश्‍मश्रुद्विजप्रपतनं श्रमः ।
ज्ञेयमस्थिक्षये लिं सन्धिशैथिल्यमेव च ।।
..... चरक सूत्रस्थान
केस, रोम, नख, दाढी-मिशांचे केस गळणे तसेच दात तुटणे, फार परिश्रम न करताही थकवा जाणवणे, सांध्यांमध्ये शिथिलता जाणवणे ही सर्व लक्षणे हाडांचा क्षय झाल्यामुळे उद्‌भवतात.
प्रकृतीनुसारही केस निरनिराळे असतात. कफप्रकृतीचे केस आदर्श म्हणावे असे असतात. दाट, मऊ, लांब व सहसा न गळणारे, न पिकणारे केस कफाचे असतात, पित्तप्रकृतीमध्ये केस गळण्याची, पिकण्याची प्रवृत्ती बरीच असते, तसेच पित्ताचे केस मऊ असले तरी फार दाट नसतात. वातप्रकृतीचे केस राठ असतात, केसांची टोके दुभंगणे, केस तुटणे व गळणे वगैरे लक्षणे वातप्रकृतीमध्ये दिसतात.
आनुवंशिकतेचाही केसांशी संबंध असू शकतो. आजीचे, आईचे लांब केस असण्याची प्रवृत्ती असली तर मुलीचेही केस लांब असण्याची शक्‍यता मोठी असते, अर्थात आनुवंशिकता प्रकृतीमध्ये अंतर्भूत असतेच.
या सर्व माहितीवरून लक्षात येऊ शकते की केसांवर प्रकृतीचा व हाडांचा मोठा प्रभाव असतो.
केशवर्धनासाठी योग व तेले
केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग दिलेले आहेत, अनेक तेलेही सांगितली आहेत की ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहील व केस वाढतील. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमुक तेल लावले की माझे केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
बऱ्याचदा केसांच्या बाबतीत फक्‍त बाह्योपचार पुरेसे आहेत असे समजले जाते. अमुक तेल लावले, अमुक पदार्थ वापरून केस धुतले की चांगले राहतील, वाढतील अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र त्याहून अधिक महत्त्व अस्थिपोषक द्रव्ये घेण्याला असते. दूध, खारीक, शतावरी कल्प, नैसर्गिक कॅल्शियम असणारी शंखभस्म, प्रवाळभस्म, कुक्कुटाण्डत्वक्‌ यांसारखी द्रव्ये केसांच्या आरोग्यासाठी बाह्योपचारापेक्षा अधिक उपयुक्‍त असतात. बऱ्याचदा असे दिसते की हाडांशी संबंधित विकारांवर उपचार करत असता केसांमध्ये अनपेक्षित सुधारणा होताना दिसते किंवा च्यवनप्राश, सॅनरोझसारखी एकंदर प्रतिकारशक्‍ती वाढवणारी रसायने नियमित सेवन केली, प्रकृतीनुरूप आहार-आचरणाने दोष संतुलित ठेवता आले तर केस गळायचे थांबतात, काही लोकांचे अकाली पांढरे झालेले केस काळे होताना
दिसतात.
केसांची निगा राखण्यामध्ये तेल लावणे महत्त्वाचे असते यात संशय नाही. अस्थिधातू, केस हे शरीरघटक वाताच्या आधिपत्याखाली येतात आणि वात म्हटला की त्याला संतुलित ठेवण्यासाठी तेलासारखा दुसरा श्रेष्ठ उपचार नाही. केसांना तेल लावण्याने त्यांच्यातला वात नियंत्रित राहतो, अर्थातच केस तुटणे, कोरडे होणे, दुभंगणे, गळणे या सर्वांना प्रतिबंध होतो.
केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते. डोक्‍यात कोंडा होणे, खवडे होणे वगैरे त्रास सहसा होत नाहीत, मात्र हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेल चांगल्या प्रतीचे, केश्‍य म्हणजे केसांना हितकर द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे लागते. असे सिद्ध तेल केसांच्या मुळांना लावले की लगेचच आतपर्यंत शोषले जाते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते. मात्र कच्चे तेल म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही असे तेल कितीही शुद्ध असले, भेसळमुक्‍त असले तरी ते आतपर्यंत जिरण्यास अक्षम असल्याने केसांना तेलकटपणा आणण्याशिवाय फारसे उपयोगी पडत नाही. उलट केस तेलकट झाले की तेल काढून टाकण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेले शांपू, साबण वापरावे लागतात, ज्यांचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.
केस निरोगी हवेत
तेल लावण्याने केसांचे आरोग्य सुधारत असल्याने काही प्रमाणात केस लांब होण्यासाठीही फायदा होऊ शकतो; पण त्या लांब होण्याला प्रकृतीची, वयाची, एकंदर शरीरशक्‍तीची मर्यादा राहील हे लक्षात घ्यायला हवे.
केसांच्या लांबीची चर्चा करताना एक गोष्ट समजून घ्यायला हवी की केस नुसतेच लांब असण्यापेक्षा ते निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. मूळचे लांब केसही गळत असले, तुटत असले आणि निर्जीव दिसत असले तर आकर्षक वाटणे शक्‍य नसते. त्यामुळे केसांची नुसती लांबी वाढविण्याच्या मागे न लागता केस बळकट राहतील, छान तेजस्वी राहतील, काळे राहतील याकडे लक्ष द्यायला हवे.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उपाय
केश्‍य द्रव्यांनी सिद्ध केलेले व आतपर्यंत जिरणारे "संतुलन व्हिलेज हेअर तेला'सारखे तेल केसांना नियमितपणे लावणे केसांसाठी उत्तम असते. कृत्रिम रंग, गंध घालून तयार केलेले तेल टाळणेच श्रेयस्कर होय.
केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक द्रव्ये, उदा., शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण किंवा तयार "संतुलन सुकेशा' वापरणे चांगले असते.
आठवड्यातून दोन वेळा केस धुवावे.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
आठवड्यातून एकदा, केस धुण्याआधी केसांच्या मुळाशी लिंबाची फोड चोळून नंतर अर्धा तास कोरफडीचा गर लावून ठेवण्यानेही केसांचे आरोग्य चांगले राहते. केस गळणे, कोंडा होणे वगैरेंना प्रतिबंध होतो.
आहारात दूध, खारीक, शतावरी कल्प, "कॅल्सिसॅन', "सॅनरोझ' वगैरेंचा समावेश असू द्यावा.
उन्हात फिरताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी उपाय योजणे, उष्णतेजवळ किंवा संगणकावर काम असल्यास, रात्रीची जागरणे किंवा रात्रपाळी असल्यास पित्त कमी करण्यासाठी "सॅनकूल चूर्ण', "संतुलन पित्तशांती गोळ्या', नियमित पादाभ्यंग वगैरे उपाय योजणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

केसात चाई कशामुळे होते व त्यावर उपाय काय करावेत

fly