शनिवार, 29 अप्रैल 2023

पैशाच्या आसक्तित राहू नये.

 


पैशाच्या आसक्तित राहू नये.


कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर कोणी विचारले की, 'त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा ?' तर मी सांगेन की, 'पैसा हा त्यांतला त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो.' 


भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे ? यासाठी, भिकार्‍याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. 


एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण 'स्व' देणार नाही. 'स्व' देऊन मग 'सर्व' ठेवले तरी चालेल, पण 'सर्व' देऊन 'स्व' ठेवला तर ते मात्र चालणार नाही; म्हणजेच, 'मी देतो' ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते.


देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार ? मी 'माझा' देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे, हे आपल्या हातात आहे का ? 'मी माझे रक्षण करीन ' असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते; म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे ! देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार ? एक भगवदिच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. 


समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून, रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले; म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले, आणि त्यालाच खरे समाधान मिळाले.


राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा ? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तित तुम्ही राहू नका. ही आसक्ति नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संतसमागम हाच होय. 


आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे ! 

संतांना आपण खोटेपणा देतो. पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. 


विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संताकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता कितीजण संताकडे जातात ? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील ?

शुक्रवार, 28 अप्रैल 2023

🏵️ वहीनी...!

 🏵️🌀🌀🌀🌀🌀🏵️

 वहीनी...!

🏵️🌀🌀🌀🌀🌀🏵️

वहिनी अगदी पारंपारिक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली निमूट सप्तपदी पूर्ण करून. दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली, सामावली...


पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही. सासरी जे घडेल, त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असायचं. त्यात कुणाला कधी खटकलं नाही, कारण एरवी तिचं वागणं अगदी सालस आणि समजूतदार होतं..


तिचं माहेरही होतंच तसं तालेवार; त्यानी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली, ती केवळ माणसं बघूनच. त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी आगाऊपणा झाला नाही, की अवमान झाला नाही.


वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा... हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं.


ती माहेराहून आली, की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे.. अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे. त्यांचा भलामोठा वाडा, त्यांची लांबच लांब पसरलेली बाग, फुलांचा ढीग, बागेशी येणारे मोर, वाट चुकून आलेली हरणं सगळंच स्वप्नवत वाटावं असं !


म्हणजे ही स्केटींग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी  मुलगी...  दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी ? याचं आश्चर्य वाटतं ?


मधे तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचंच...  कारण तो परिसर, ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती..


मी दहावीत नापास झालो, तेव्हा आईचं काही न ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती. म्हणाली, "आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडावून सोडतील..."


चित्रपटात कसं पाहुणे आले, की ती घरची बाई नोकराला सांगते- "इन्हें इनका कमरा दिखाओ.." किंवा जवळचा कोणी असेल, तर "आओ, मैं तुम्हे तुम्हारा कमरा दिखाती हूँ" असं म्हणून दृश्यातून एक्झीट घेते..


पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं..


वहिनीचं माहेरही तसंच चौसोपी होतं ! त्यात वहिनी माहेरची मोठी लेक ! त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती..


मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली, मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती. माझी "दहावी नापास होणं" एका अर्थी  "सेलिब्रेट" केलं जात होतं..


म्हणजे एकूण काय, अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं..


मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली. वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही, पण तरी आमच्या परीने त्याने आसमान को हाथ छू लिये...


पण एक जाणवायला लागलं... वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं. कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा आग्रह राहिला नव्हता.


मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून आलिशान बंगला बांधला गेला. दोन्ही भावांची आॅफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती...


वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते. मलाही बोलावलं होतं, पण जायला जमलं नाही.


पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली...


शेवटी न राहवून मी वहिनीला विचारलंच, "म्हटलं, हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस?"


ती खिन्नपणे म्हणाली,"काय बोलू?"


"काय झालं?" मी विचारलं.


ती म्हणाली, "तसं पाहिलं तर काहीच झालं नाही.. सगळं रीतीला धरून झालं. पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतोय."


क्षणभर गप्प राहून ती म्हणाली, "आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो. आपण आता त्या घराला परके झालो, हे आमच्या लक्षातच येत नाही... आणि माहेरचे लेक परकी झाली...  हे गृहीतच धरून चलतात... खूप यातनामय आहे हे!"


"वहिनी, नीट सांग."

मी काकुळतीला येते म्हणालो..


तशी ती म्हणाली,

"काही नाही रेsssss आधी वाडा होता, त्यात माझी स्वत:ची खोली होती.. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे."


"मग आता?"

मी नं राहवून विचारलं.


आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला पण त्यात मला कुठेच जागा नाही....


म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्ष लंडनला जायचाय, तरी त्याची रूम आहे; ... आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे, दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स ..


पण ताईची जागा या घरात अबाधित आहे, असं कोणालाच वाटलं नाही..


मी सहज विचारून गेले 'माझी रूम?'


तर शंतनू म्हणाला, 'गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच.'


जागा होती, पण सामाऊन घेणं जे म्हणतात... ते  त्यांच्या लक्षातही आलं नाही..


मग मी मनापासून या घराकडे वळले या घरची होऊन गेले..


पण ही रीत मी मोडेन. आपण जेव्हा बंगला बांधू. मी छकुलीचं लग्न झालं, तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन...


गेस्टरूम मधे पाहुणे उतरवायचे... आपल्या लेकीबाळी नाही. त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी... त्या आपल्याच असतात."


.....वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो...


fly