रविवार, 9 अप्रैल 2023

रामायणातील एक अनोखी कथा

 रामायणातील एक अनोखी कथा वाचण्यात आली ...


हनुमंताची प्रखर रामभक्ती सर्व जगाला ठाऊक आहे आणि भक्ती कशी असावी याचं हनुमंत हे मूर्तिमंत उदाहरण आहे. लक्ष्मणाची रामभक्तीही अशीच अद्भुत होती. लक्ष्मणाच्या उल्लेखाशिवाय रामायण अपूर्ण असेल. 


सीतेसहवर्तमान अयोध्येत परतल्यानंतर एकदा अगस्त्य मुनी श्रीरामांना भेटण्यासाठी म्हणून अयोध्येत आले. त्यांचं यथायोग्य स्वागत केल्यानंतर गप्पांच्या ओघात लंका युद्धाचा विषय आला. 


रामायणातील का एक फारसं माहित नसलेलं सत्य आता ऐका....


केवळ आणि केवळ लक्ष्मणच मेघनादचा संहार करू शकणार होता. 

आपल्याला त्यामागचं कारण जाणून घ्यायचंय कां? वाचा तर मग.... 


भगवान श्रीराम, आपण रावण आणि कुंभकर्ण या सारख्या अतिशय शूर योद्ध्यांचा आणि लक्ष्मणानेही इंद्रजित आणि इतर अनेक महाकाय आणि अतिशय शक्तिशाली असुरांचा रणांगणात कसा संहार केला हे सांगू लागले.   


यावर अगस्त्य मुनि म्हणाले, "श्रीरामा, रावण आणि कुंभकर्ण अतिशय शूर आणि पराक्रमी योद्धे होते यांत कुठलीही शंकाच नाही, पण असुरांमधील सर्वात अधिक वीर असुर हा तर मेघनादच होता.त्याने अंतरिक्षात स्थिर राहून इंद्राशी युद्ध केले होते आणि त्या युद्धात इंद्राचा प्रचंड पराजय करून त्याच्या मुसक्या बांधून इंद्रजिताने त्याला लंकेला आणले होते. ब्रह्मदेवाने इंद्रजिताकडे त्याने हरण करून आणलेल्या इंद्राचे दान मागितले तेव्हा कुठे इंद्राची मुक्तता झाली. या अ तिशूर असुराचा वध लक्ष्मणाने केला म्हणूनच मी लक्ष्मणाला सर्वात मोठा योद्धा समजतो. 


अगस्त्य मुनींचे हे बोलणे ऐकून श्रीरामांना आश्चर्य वाटले, पण आपल्या बंधूंच्या शौर्याची प्रशंसा अगस्त्य मुनींसारख्या ज्येष्ठ मुनींच्या तोंडून ऐकून श्रीरामांना मोठाच आनंद झाला होता. तरीही, इंद्रजिताचा वध करणे हे रावणाचा वध करण्यापेक्षा अधिक कठीण कार्य होते असे अगस्त्य मुनी कां म्हणत आहेत याबद्दल श्रीरामांना कुतूहल वाटू लागलं. 


अगस्त्य मुनि म्हणाले, "रामा, इंद्रजिताला असा वर प्राप्त झाला होता की ज्याने  

(१) चौदा वर्षे झोप घेतली नसेल,

(२) चौदा वर्षे कुणाही स्त्रीचं मुखदर्शन केलेलं नसेल आणि 

(३) चौदा वर्षे भोजन केलेलं नसेल 

अशाच माणसाकडून इंद्रजिताचा वध होऊ शकेल."


यावर श्रीराम म्हणले, " परंतु मी वनवासाच्या काळांत चौदा वर्षेपर्यंत नियमितपणे लक्ष्मणाला त्याच्या वाट्याची फळं फुलं देत होतो. मी सीतेसोबत एका पर्णकुटीत राहत होतो आणि माझ्या कुटीच्याच बाजूला लक्ष्मणाची कुटी होती. मग लक्ष्मणाने इतक्या वर्षांत सीतेचा चेहेराही पहिला नसेल आणि चौदा वर्षांपासून तो झोपही नसेल हे कसे शक्य आहे?"  


अगस्त्य मुनि श्रीरामाचे हे बोलणे ऐकून हसले. प्रभू रामचंद्रांपासून कांही लापु शकणार नव्हतेच. खरं तर सर्वच लोक फक्त श्रीरामाचेच गुणगान करीत असत. श्रीरामांची मात्र अशी इच्छा होती की लक्ष्मणाचा अभूतपूर्व त्याग आणि त्याचे शौर्य, त्याचा पराक्रम सुद्धा जनतेला समजावा आणि त्याच्याही विरागाथेची चर्चा अयोध्येतील घराघरात व्हावी. 


यावर अगस्त्य मुनि म्हणाले, "श्रीरामा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण लक्ष्मणाकडूनच जाणून घेऊ या." 

लक्ष्मणाकडे वळून श्रीराम त्याला म्हणाले, "लक्ष्मणा, मी तुला विचारीन त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे."


रामाने विचारले, " आपण तिघंही सोबत सोबत चौदा वर्षे एकत्रच राहत होतो, तरीही सीतेचे मुखकमल तुझ्या दृष्टीस कसं पडलं नाही? तुला मी दररोज तुझ्या हिश्श्याची फळं, अन्न वाटून देत होतो तरीही तू इतक्या वर्षांत कांहीच खाल्लं नाहीस हे कसं शक्य आहे? आणि चौदा वर्ष तू अजिबातच झोपला तरी कसा नाहीस?  हे सारं खरं आहे कां?"    


तेव्हा लक्ष्मण म्हणाला, "दादा, आठवतंय? जेव्हा आपण वहिनीच्या शोधार्थ बाहेर पडलो आणि ऋष्यमूक पर्वतावर पोहोचलो त्यावेळी सुग्रीवाने आपल्याला तिची आभूषणे दाखवून ती तिचीच आहेत कां हे ओळखण्यास सांगितले होते. तुला स्मरत असेलंच की मी तिच्या पायांतील पैंजणांव्यतिरिक्त अन्य कुठलीही आभूषणे ओळखू शकलो नव्हतो, कारण मी वहिनीच्या चरणांशिवाय इतर कुठेही पाहत नव्हतो."   


चौदा वर्षे निद्रा न घेतल्याबद्दल लक्ष्मणाने काय उत्तर दिले ते ऐका. "दादा, तू आणि सीतामाई एका कुटीत झोप घेत असतांना मी हाती धनुष्यबाण घेऊन सज्ज अवस्थेत उभा राहून कुटीबाहेर पहारा करीत राहायचो. निद्रेने माझ्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तिला आपल्या बाणांनी जर्जर करून सोडले होते. शेवटी पराभूत निद्रादेवीने मी तुला चौदा वर्ष स्पर्शही करणार नाही, पण नंतर जेव्हा श्रीरामाचा अयोध्येत राज्याभिषेक सुरु असेल आणि तू त्यांच्या पाठी, त्यांच्या मस्तकावर छत्र धरून उभा असतांना मी तुला माझ्या ताब्यात घेईन हे माझ्यापाशी कबूल केलं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी दादा, तुझ्या मस्तकावर छत्र धरलेले असतांना अचानक मला भोवळ आल्याचे तुला आठवतच असेल? आता मी चौदा वर्ष कांहीच न खाता कसा राहिलो हे देखील सांगतो. मी जी कांही फळं, खाद्य आपल्यासाठी आणत होतो, त्याचे दादा, तूच तीन वाटे करीत होतास आणि माझा वाट माझ्या हाती देऊनटू म्हणायचास, 'लक्ष्मणा, ही फळं ठेव तुझ्यासाठी. तू मला कधीच फळं खा असं म्हणाला नाहीस. मग तुझी आज्ञा नसतांना मी ती फळं कशी बरं खाईन? मी ती फळं सांभाळून ठेवीत असे. अजूनही माझ्या त्या कुटीत ती फळं असतील."


रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने चित्रकूट पर्वतावरील आपल्या कुटीतून त्या साऱ्या फळांच्या करंड्या आणून त्या दरबारात ठेवल्या. त्या फळांची मोजणी करण्यात आली तेव्हा सात दिवसांची फळं कमी असल्याचं दिसून आलं. मग रामांनी लक्ष्मणाला विचारलं, " म्हणजे याचा अर्थ तू सात दिवस तरी फलाहार केला होतास?" 


सात दिवसांची फळं कमी असण्याची कारणे लक्ष्मणाने सांगितली. तो म्हणाला ह्या सात दिवसांत मी फळं आणूच शकलो नाही. ते सात दिवस म्हणजे -  

१--ज्या दिवशी राजा दशरथ यांचं निर्वाण झालं त्या दिवशी आपण कुणीच जेवलो नव्हतो.

२--ज्या दिवशी सीतामाईंचं अपहरण रावणाने केलं, त्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी मी फळं कशी आणीन बरं? 

३--ज्या दिवशी आपण सागराची प्रार्थना करून  त्याला लंकेपर्यंत वाट मोकळी करण्यासाठी विनविले होते त्या दिवशीही मी फळं आणली नव्हती.

४--ज्या दिवशी दादा इंद्रजिताने तुला नागपाशाने जखडून ठेवल्यानंतर तू दिवसभर अचेतन होतास त्या दिवशीही मी फळं आणली नव्हती.  

५--ज्या दिवशी इंद्रजिताने मायावी सीतामाईची शस्त्राने हत्या केली होती त्या दिवशी दुःखाने आपल्याला खाण्याचीही शुद्ध नव्हती.

६--ज्या दिवशी रावणाने आपल्या शक्तीचा माझ्यावर वापर केला त्या दिवशी मी अचेतन होतो आणि मी कांहीही खाण्याचा प्रश्नच  नव्हता. रावण ने मुझे शक्ति मारी,

७--आणि ज्या दिवशी दादा, तू रावणाचा वध केलास. 


ह्या सात दिवसांत आम्हाला भोजन करण्याची शुद्ध नव्हती.  विश्वामित्र मुनींकडून मी एक विशेष विद्या प्राप्त केली होती - कांहीही न खाताही जिवंत राहण्याची विद्या. ह्या विद्येचा प्रयोग मी चौदा वर्ष केला आणि इंद्रजिताला पराभूत करण्यासाठीच्या सर्व अति माझ्या हातून पूर्ण झाल्या आणि म्हणूनच मी त्याला रणांगणात ठार करू शकलो.  

भगवान श्रीराम आज प्रथमच लक्ष्मणाने केलेल्या या विलक्षण तपस्येची कथा ऐकत होते. त्यांनी मोठ्या प्रेमाने लक्ष्मणाला आपल्या हृदयाशी धरले आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू अोघळू लागले. 


जय श्री राम

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly