सोमवार, 10 अप्रैल 2023

'भाऊचा धक्का' बांधणारा भाऊ

 


मुंबईत जलवाहतुकीसाठी 'भाऊचा धक्का' बांधणारा भाऊ कोण? ते टोपण नाव आहे की नावाचा झालेला अपभ्रंश?


एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा 158 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर.


गेल्या दीड शतकाहूनही अधिक काळ या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असतात. पण यातील बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की, या धक्क्याला भाऊचा धक्का का म्हणतात? कोण हे भाऊ?


‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू, या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार….


स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.. ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी. त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळून त्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला. त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.


स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला. कॅप्टन रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली.


या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला भाऊ हे नाव पडले ते कायमचे! कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले. मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले.


मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून करनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती. तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.


कोकणच्या जलवाहतुकीसाठी आजतागायत वापरात असलेला ‘भाऊचा धक्का!’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक. रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्या अधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. 1862 साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची.


मग मोठय़ा हिंदकळणाऱ्या होडय़ांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याच पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले, आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला. कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे.


सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपापर्यंत भाऊच्या धक्क्य़ाला उसंत नसेच. या काळात भाऊच्या धक्क्य़ाचा अवतार. रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर दिसणारा असा,  बोट धक्क्य़ाला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्या हमालांचा जथ्था..


एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन ‘..आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर’ अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्य़ाला समांतर आणीत असे.


बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्य़ावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्य़ाला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठडय़ावरून हनुमानउडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.


कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपडय़ात, केव्हा एकदा जमिनीवर पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. उलट्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकट्या आणि आंबा-फणसाची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.


एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली, तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो.....

'मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा!’

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly